वैचारिक कृत्रिम मर्यादितपणा हा डोळसपणे स्वीकारलेला आणि समूहाची दिशाभूल करणारा एक घातक निर्णयच आहे. आपणास हव्या त्या वेळेस आणि हव्या त्या गोष्टीवरच आपले वैचारिक मर्यादित मत व्यक्त करणे व ज्या गोष्टी विरोधी अथवा आपल्या विचारांच्या कक्षेवर घाव घालतात अशा गोष्टीत आपल्या मानवतावादी किंवा संस्र्कृतिक विचारांना झाकणबंद करणे कितपत योग्य?

मुक्त लोकशाहीवादी विचारप्रसाराचे काम करणाऱ्या आणि समाज्याच्या कल्याणासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा खून केला जातो त्यावेळेस सांस्कृतिक विचारधारा अगदी निश्चिंत असते. अशाचपद्धतीने जेव्हाकुठे देशाला सीमा वगेरे राष्ट्रप्रेम वगेरे नसतेच अशा अविर्भावात वावरणार्यांचा निषेध न करता उलट त्यांचे समर्थन स्वताला मानवतावादी वगेरे समजणाऱ्या लोकांकडून होते.

वर्षानुवर्षे धर्मिकतेवर आधारित लोकसमूहांच्या भावनेशी खेळून सत्ता ग्रहण करणार्यावरती निधर्मवादी म्हणवून घेणारे कधीच टीका करत नाहीत. अशाचपद्धतीने संस्र्कृतिक जतनाच्या नावाखाली कत्तली करणाऱ्यावरती सांस्कृतिक विचारसरणीचा आवाज कधीच उमटत नाही.

जेव्हा अजमेर दर्ग्याचे दिवान तिहेरी तलाक सारख्या जुलमी पद्धतीवर टीका करतात तेव्हा इतर ठिकाणी आपले वैचारिक ज्ञान सतत पाजळणार्या तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांचा आवाज दिवानांच्या समर्थनार्थ कधीच उठत नाही. अशाचपद्धतीने उत्तरप्रदेशमध्ये धर्मरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन काहीही केले जाते तेव्हा संस्र्कुतिक विचारधारा जोपासणारे निर्जीव होतात.

तुमचा मर्यादित कृत्रिम विचार हा मानवी समूहांना गोंधळात टाकून त्यांना एकाच दिशेला खेचून नेणारा आहे. तुमचा उद्देशच हा आहे. 

Comments

Post a Comment